'बिग बॉस मराठी ५' ची सध्या महाराष्ट्रभर हवा आहे. या कार्यक्रमाने सगळ्यांची मनं जिंकली. गेल्या ४ सीझनपेक्षा हा सीझन जास्त गाजतोय. त्यात प्रामुख्याने निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत यांच्या नावांची सगळीकडे चर्चा आहे. मात्र या सगळ्यांची बत्ती गुल करायला घरात एक वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. घरात कोल्हापूरचा बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने प्रवेश केला आहे. मात्र त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. १८ वर्षांपूर्वी बॉडीबिल्डिंग सुरू करणाऱ्या संग्रामचा दोनदा अपघात झाला, लग्नानंतर त्याने बॉडीबिल्डिंग न करण्याचा निर्णय घेतला होता. असं काय घडलं होतं? वाचा त्याचा प्रवास.
संग्रामचा जन्म 28 डिसेंबर 1979 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे एका शिक्षक कुटुंबात झाला. संग्रामने 2001 मध्ये हौस म्हणून बॉडी बिल्डिंग सुरू केली. 2010 मध्ये जेव्हा त्याला मिस्टर इंडिया फिट ही पदवी मिळाली तेव्हा त्याने जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याचा विचार केला. 2011 मध्ये मिस्टर एशियामध्ये तिसरा आणि 2012 मध्ये चीनमध्ये मिस्टर युनिव्हर्सचा किताब मिळवला. 2013 मध्ये एका स्टेज शोमध्ये पोज देताना त्याच्या पायाच्या वरच्या सांध्याला फ्रॅक्चर झालं त्यानंतर त्याला बेडरेस्ट घ्यावी लागली आणि त्याचं शरीर पूर्णपणे बारीक झालं.त्यानंतर पुन्हा स्पर्धेसाठी उभं राहणं कठीण आहे असं सगळे म्हणाले मात्र तो हिंमत हरला नाही.
संग्राम एका मुलाखतीत म्हणालेला, 'जेव्हा अपघात झाला त्यावेळी माझी आर्थिक तयारी नव्हती. मी कामावर लक्ष केंद्रित केलं, नंतर फिनिक्स नावाने आठ जिम सुरू केले. आयुष्यात पैसा म्हणजे काय हे मला त्यावेळी समजलं. बरा झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या शरीरावर काम करू लागलो आणि 2014 मध्ये मी पुन्हा एकदा मिस्टर वर्ड बनलो. पण 2015 मध्ये पुन्हा अपघात झाला. त्या कार अपघातात छाती आणि खांद्याला दुखापत झाली. या सगळ्यानंतरही मी स्वत:ला तयार केलं.
संग्रामने मुलाखतीत म्हणाला, 'लहानपणी कुटुंबाच्या कमाईतून सहा लोकांचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण होतं. मी माझं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतून पूर्ण केलं आणि 12वी नंतर पॉलिटेक्निक कॉलेज, बहादूरगड येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बी.ए.चे शिक्षण सुरू केले. कॉलेजमध्ये शिकत असताना तो पुण्यातील फॅशन डिझायनर स्नेहलच्या प्रेमात पडला आणि नंतर लग्न झालं. लग्नानंतर मी घर चालवण्यासाठी एका कंपनीत काम करू लागलो, पण तिथून मिळणारा पगार कुटुंब आणि बॉडी बिल्डिंग दोन्ही चालवण्यासाठी पुरेसा नव्हता. पैशाअभावी बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला.
तो पुढे म्हणाला, 'पण, जेव्हा माझ्या जवळच्या मित्रांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी माझ्या अनेक दिवसांच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला. त्यांच्यामुळे मी माझी बॉडीबिल्डिंग सुरू ठेवू शकलो. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. काही दिवसांनंतर मला त्याच जिममध्ये ट्रेनरची नोकरी मिळाली जिथे मी वर्कआउट करायचो आणि दोन्ही जॉब एकाच ठिकाणी करू लागलो.' आता संग्राम बिग बॉसमध्ये आला आहे. आता तो घरात कोणत्या ग्रुपचा भाग होणार की एकटा खेळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.